



पुरंदर कृषी एक्स्पो २०२६’ शेतकर्यांना नवी प्रेरणा देणारे-कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
३० जूनपूर्वी शेतकर्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देणार
जमिनी विकू नका, येणारे दिवस शेतीचे: भरणे यांचे आवाहन
“बदलत्या हवामानामुळे शेतकरी सातत्याने अडचणीत येत आहे. अशा परिस्थितीत आम्ही शासनाच्या वतीने शेतकर्यांना सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत असून, येत्या ३० जूनपूर्वी शेतकर्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जाईल,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी येथे केली.
सासवड येथे शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘पुरंदर कृषी एक्स्पो २०२६’ या कृषी व पशू प्रदर्शनाला रविवारी (ता. २४) कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भेट दिली. या प्रदर्शनाचे उत्तम आयोजन व नियोजन केल्याबद्दल माजी आमदार संजय जगताप व ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांचे कौतुक करत त्यांनी जगताप कुटुंबाच्या योगदानाचा गौरव केला. या प्रदर्शनाला शेतकरी, युवक आणि नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक रमेश थोरात, आप्पासाहेब जगदाळे, दिलीप मोहिते, पुजा बुट्टे पाटील, निर्मला जागडे, संजय काळे, तसेच सारिका भरणे, हेमंतकुमार माहूरकर, आयोजक माजी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, समरादित्य जगताप, कात्रज डेअरीचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, निरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, संचालक मनिषा नाझीरकर, देविदास कामथे, संभाजी काळाणे, विठ्ठल मोकाशी, तुषार माहूरकर यांसह संयोजक प्रदीप पोमण, प्रकाश पवार, संभाजी गरुड, विलास जगताप, रवींद्रपंत जगताप, सतिश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगताप कुटुंबाचे योगदान: “हे कुटुंब माजी आमदार कै. चंदुकाका जगताप यांचे असून त्यांनी सहकारात कडक आणि शिस्तबद्ध काम केले. तालुक्यातील नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रात चंदुकाकांनी मोठे योगदान दिले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून संजय जगताप हे उत्तम काम करीत आहेत., गौरवोद्गार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.
आधुनिक शेतीची गरज: “आजची शेती आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानाने केली पाहिजे. उत्पादन वाढीसाठी नवीन गोष्टींचा स्वीकार करावा, याची माहिती अशा प्रदर्शनातून मिळते. शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या नवनवीन योजनांमध्ये भाग घ्यावा आणि नैसर्गिक शेतीकडे वळावे. खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत., असे आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
“नवीन बियाणे आणि खते यांत मोठे संशोधन होत आहे. शेतकऱ्यांनी नेहमी कृषी विभागाच्या संपर्कात राहून नवीन पद्धतीने शेती करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जमिनी विकू नका, कारण येणारे दिवस हे केवळ आणि केवळ शेतीचेच असणार आहेत.”
दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री