पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

Photo of author

By Sandhya

जिल्हा सत्र न्यायाधीशांनी उलगडला बालगृहातील मुलींसमोर जीवन प्रवास

सासवड (प्रतिनिधी) : “मुलींनो, मी माझेच उदाहरण तुम्हाला देतो…”मी आठवी-नवीत शिकत असताना आमच्या शेतात जाण्याचा रस्ता बसस्थानकावरून जात असे. तिथून लाल दिव्याची एक गाडी जाताना दिसायची. ती कलेक्टरची गाडी असल्याचे बाबांनी सांगितले आणि त्याच क्षणी माझ्या मनात कलेक्टर होण्याचे स्वप्न निर्माण झाले. दुर्दैवाने कलेक्टर -आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, पण जिद्द सोडली नाही. त्याच चिकाटीमुळे आज मला जिल्हा सत्र न्यायाधीश या सर्वोच्च सांविधानिक पदावर सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करा, “मोठी स्वप्ने पाहा, न्यायाधीश व्हा आणि समाजासाठी जगा”, या भावनिक शब्दांनी आपल्या मनोगताची सुरुवात करत पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. अरविंद वानखेडे यांनी बालगृहातील विद्यार्थिनींसमोर आपल्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडला. बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील मुलगा ते पुणे जिल्ह्याचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हा त्यांचा प्रवास ऐकताना उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर भारावून गेले.

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, येथे गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी आयोजित “गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात” ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. बालगृहातील मुलींशी अत्यंत आपुलकीने संवाद साधताना त्यांनी न्यायव्यवस्थेतील संधी, शिक्षणाचे महत्त्व आणि ध्येयवादी जीवनाची प्रेरणा दिली. “तुमच्यापैकी अनेक मुली उद्या न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर किंवा समाजसेविका होऊ शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि शिक्षणाला कधीही सोडू नका,””मोठी स्वप्ने पाहा, न्यायाधीश व्हा आणि समाजासाठी जगा” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, “बालगृह, अनाथालय, मुकबधिर तसेच अंध विद्यार्थ्यांच्या शाळांमधील शिक्षण आणि तेथील उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत. येथे ऐकलेली ‘माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे’ ही प्रार्थना मानवतेचा खरा संदेश देते. प्रत्येक माणसामध्ये ईश्वराचे रूप पाहून एकमेकांना मदत करणे हेच आपले कर्तव्य आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही विविध जनजागृती उपक्रम राबवत असून माईंच्या संस्थेला भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य कायम राहील.” विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी अनेक प्रश्न विचारले. मुलींनीही आत्मविश्वासाने दिलेल्या उत्तरांचे कौतुक करत त्यांच्या विचारक्षमतेचे अभिनंदन केले. “लहान वयातच मनात ध्येय, सकारात्मक विचार आणि संघर्ष करण्याची तयारी निर्माण झाली, तर यश तुमच्या पावलांशी नक्की येईल,” असेही त्यांनी सांगितले.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मा. रेवती देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. माईंच्या विचारांचा आणि संस्कारांचा अमूल्य ठेवा तुमच्याकडे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कठोर परिश्रमाच्या बळावर इतिहास घडविला. त्यामुळे अपयशाकडे निराशेने नव्हे, तर पुढील यशाची संधी म्हणून पाहा. सकारात्मक दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला निश्चितच यश मिळवून देतील.”असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ममता सपकाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक (दादा) गायकवाड होते. या कार्यक्रमास पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे, सासवडचे दिवाणी न्यायाधीश टी. पी. मोटे, द्वितीय सह न्यायाधीश आर. ए. सावंत, सह न्यायाधीश एस. जी. सावंत, ममताताई सपकाळ, विनय सपकाळ, सार्थक सेवा संघ (आंबळे)चे अनिल कुडीया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षिका स्मिता पानसरे, सूत्रसंचालन मुकेश चौधरी, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रसन्न गायकवाड, मंजुषा गायकवाड, ज्योती गायकवाड, मोनिका राजगुरू, नाना कुंभारकर, रितेश जांभुळकर, आकाश गोगावले यांच्यासह ममता बाल सदनमधील सर्व कर्मचारीवृंद आणि विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Comment

You cannot copy content of this page