देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा डाव रचला होता, असा आरोप मनोज जरांगे यांनी केल्यानंतर त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, कोण कशाला जरांगे यांचा घात करेल? त्यांचा घात कोणीही करणार नाही.
त्यांची सगळी नाटके मराठा समाजाला समजली आहेत. पत्रकारांशी येवला येथे बोलताना भुजबळ म्हणाले, जरांगे यांच्यावर कोणीही हल्ला करण्याची शक्यता नाही. ते एकामागोमाग आरोपांच्या फैरी झाडत आहेत.
एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये, तर दुसऱ्या क्षणाला अंतरवाली सराटी असा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे. त्यांचा बनाव मराठा समाजाला कळून चुकला आहे.
सरकारलाही त्यांच्या मागण्यांतील फोलपणा समजला आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांची मालिका वाढतच चालली आहे. आम्ही दहा जागा मागितल्या दरम्यान, भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी त्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नसल्याबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले, महाराष्ट्राची यादी तयार नाही हे खरे आहे.
मात्र, महाराष्ट्रात काम करणारे उमेदवार कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशातील जौनपूरहून उमेदवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात ४८ खासदार आहेत. त्यांची चाचपणी करून उमेदवार ठरतील. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने १० जागा मगितल्या आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.