संजय राऊत : “अटकेची शक्यता निर्माण झाल्यावर फडणवीस शिंदेंना म्हणाले, तुम्ही…”

Photo of author

By Sandhya

संजय राऊतां

महाविकास आघाडीचं सरकार असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना अटक केली जाणार होती, असा गौप्यस्फोट मविआ सरकारमधील तत्कालीन मंत्री आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

शिंदेंच्या मविआवरील या आरोपांवर मविआ नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.

राऊत म्हणाले, फडणवीसांसह अनेक भाजपा नेते काही गुन्ह्यांमध्ये सहभागी होते. मविआ सरकार त्याप्रकरणी तपास करत होतं. फडणवीसांना वाटू लागलं होतं की, आता आपल्याला अटक होणार आहे. त्यामुळेच त्यांनी मविआ सरकार पाडण्यासाठी पावलं उचलली.

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, सरकार कोणालाही विनाकारण अटक करत नाही, अपराधी कितीही मोठा असला तरी कायद्यासमोर सर्वजण समान असतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सध्याचे बॉस म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा म्हणणं आहे.

म्हणूनच मोदींच्या सरकारने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. त्याचबरोबर अनेक मंत्र्यांना, आमदारांना आणि खासदारांनादेखील अटक केली आहे. ही अटक करताना त्यांच्या नावाशी एखादा गुन्हा जोडला आहे.

आता आपले मुख्यमंत्री बोलत आहेत की उद्धव ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना अटक करण्याची योजना आखली होती. मुळात शिंदेंच्या डोक्यात हे कुठून आलं? कारण या लोकांनी काहीतरी केलं असेल ना… विनाकारण कोणी कोणाला का बरं अटक करेल? देवेंद्र फडणवीस फोन टॅपिंग (बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण) प्रकरणात अपराधी होते. त्या प्रकरणी तपास चालू होता.

त्यांच्या मनात भीती होती की आता कोणत्याही क्षणी मला अटक केली जाईल. त्यांना माहीत होतं की त्यांनी अपराध केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षांमधील नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यासाठी त्यांनी दोन अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या त्यापैकी एक होत्या.

संजय राऊत म्हणाले, मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकर अपराधी होते. मुंबई बँकेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. याप्रकरणी तपास चालू होता.

जसं सिंचन घोटाळा, अमुकतमुक घोटाळ्याच्या नावाखाली मोदी सरकार विरोधी पक्षांमधल्या नेत्यांना अटक करतं तसेच गुन्हे भाजपाच्या नेत्यांनी केले असतील तर त्यांना अटक केली जाऊ शकत नाही का? हे भाजपा नेते काय अस्पृश्य आहेत का? प्रसाद लाड हे देखील त्यापैकी एक आहेत. या सर्वांनी अपराध केले आहेत.

त्यांनी केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी तपास चालू होता. त्यामुळे त्यांना अटकेची भीती होती. तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा की मोदी सरकार त्यांना का अटक करत होतं? मग त्यांनी इतरांची नाव घ्यावी. त्यांनी आधी मी विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ते चार लोक (फडणवीस, शेलार, महाजन, दरेकर) ज्यांच्याबद्दल तपास चालू होता त्यांना अटकेची भीती होती.

फडणवीसांना अटकेची भीती होती. म्हणूनच नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंवर दबाव निर्माण केला. ते एकनाथ शिंदेंना म्हणाले, तुम्ही शिवसेनेचे आमदार फोडा आणि आमच्याबरोबर या. नाहीतर आम्ही तुम्हाला अटक करू. असा सगळा खेळ चालू होता.

त्यामुळे शिंदेंनी सरकार पाडलं. तुम्ही (भाजपा) लोकांना कधीही अटक करू शकता. मात्र तुमच्या गुन्हेगारांना आम्ही हात लावू शकत नाही. खरंतर असं काही होणार नव्हतं, परंतु मी तुम्हाला सांगतोय.

Leave a Comment