बच्चू कडू : “निवडणूक ही धर्म आणि जातीवर होता कामा नये, तर…”

Photo of author

By Sandhya

बच्चू कडू

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होणार आहे. यासाठी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांच्या सभाचा धडाका लागला आहे. यादरम्यान आरोप -प्रत्यारोपाचा सत्र देखील सुरू आहे.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी कल्याणमध्ये भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार सभेत बोलताना भाजपवर निशाणा साधला.

“निवडणूक सुरु झाली आणि कापसाचे भाव हजार रुपयाने कमी झाले तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट का नाही? कारण त्याच्या डोक्यात निळा, भगवा हिरवा घातला आहे.

निवडणूक ही धर्म आणि जातीवर होता कामा नये, तर मुद्द्यावर झाली पाहिजे. निवडणूक आमच्या हक्कांवर, आमच्या वेदनेवर झाल्याचं दिसत नाही,” अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

बच्चू कडू म्हणाले की, ”34 हजार एकरावर असलेल्या मुंबईमधील सहा हजार एकर जमीन फक्त सहा लोकांजवळ आहे. या जमिनीला सील का लावला जात नाही.

मुंबई झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस पायही पसरू शकत नाही. त्याला राहायला घर नाही, अन्न वस्त्र निवाऱ्यामधील निवारा कुणी हिसकावला? जर सहा हजार एकर जमीन सहा लोकांजवळ राहत असेल, कष्ट करणाऱ्या लोकांना घरे मिळत नसतील, मग हे प्रश्न लोकांनी सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजेत.

धर्म आणि जातीच्या आडून आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये. त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबुतीने उभी राहिले पाहिजे.” पुढे ते म्हणाले, “काँग्रेस आणि भाजप यांच्या धर्माचे नातेगोते जुळवतात.

भारतात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ज्या आत्महत्या झाल्या, त्या शेतकरी, मजुर, बेरोजगारांच्या झाल्या. तो हिंदू आहे ?का मुसलमान आहे? तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधाशोध घेण्यापेक्षा तो मरतोय कोण हे महत्त्वाचं आहे. पण हे आमचे नेते लोक सांगत नाहीत.

धर्माच्या दंगलीत मेलेल्या माणसाची चर्चा होते, पण साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करतात त्याबाबत कुणी काही बोलत नाही,” अशी खंतही आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

Leave a Comment