
ग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यात -अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत
सर्व सामान्य ग्राहकांच्या समस्या मांडण्याचे काम जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्यावतीने करण्यात येते. जिल्ह्यात ग्राहकांच्या समस्यांची गांर्भीयाने दखल घेवून त्या प्राधान्याने सोडाव्यात, ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन होणार नाही यादृष्टीने सर्व संबंधित विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय तसेच अशासकीय सदस्य, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा परिषदेचे सदस्य सचिव महेश सुधाळकर, परिवहन, महावितरण, अन्न व औषध प्रशासन आदी उपस्थित होते.
श्री. राऊत म्हणाले, नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी फसवणूक टाळण्याकरिता सायबर विभागाने व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. बिबटप्रवण क्षेत्रात विशेषत: रात्रीच्या वेळी अखंडित पुरवठा राहील, याबाबत महावितरणने कार्यवाही करावी. उर्जा मित्र बैठकीचे आयोजन करुन ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात यावे, या बैठकीत परिषदेच्या सदस्यांनी निमंत्रित करावे. सदस्य सचिवांनी या बैठकीत महसूल विभागाशी निगडीत मांडण्यात आलेले विषय जिल्हाधिकारी कार्यालय येथे दरमहा आयोजित विभाग प्रमुखाच्या बैठकीत ठेवण्यात यावे.
सदस्यांनी ग्राहकांच्या सेवांबाबत मांडलेल्या सूचना विचारात घेता सकारात्क विचार करुन कार्यवाही करण्यात येईल. या सूचनांचा बैठकीच्या इतिवृत्तात समावेश करुन सर्व संबंधित विभाग तसेच सदस्यांना इतिवृत्त उपलब्ध करुन द्यावे. या इतिवृत्तानुसार संबंधित विभागाने त्वरीत कार्यवाही करुन आगामी बैठकीपूर्वी अनुपालन अहवाल सादर करावा. अनुपालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
यापूर्वीचा बैठकीतही ग्राहकांच्या अडीअडचणीसंदर्भात प्राप्त निवेदनावर संबंधित विभागाना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या बैठकीत परिषदेच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही करुन सर्व संबंधित विभागाने अनुपालन अहवाल सादर करावा, असेही श्री. राऊत म्हणाले.
यावेळी परिषदेच्या सदस्यांनी ग्राहकांच्या सेवांबाबत सूचना केल्या.