
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत हा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस असल्याचा आरोप केला आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा ब्रॉन्झचा होता. पण त्याच्या डोक्याजवळच्या भागात कापूस अन् कागद आढळल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पटोले गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, आपटेला मूर्तीकलेचा कोणताही अनुभव नव्हता.
त्यानंतरही त्याला कोणत्या आधारावर छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम देण्यात आले? अशा माणसाला काम देण्याचे कारण काय? महाराजांचा अपमान करण्याचे त्याचे धाडस कसे झाले? शिवरायांचा पुतळा ब्रॉन्झ धातूचा होता. पण त्याच्या डोक्यात कापूस व कागद असल्याचे निदर्शनास आले आहे.
हा राजकारण नव्हे तर आस्थेचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतच कोसळला. यासाठी शिल्पकार व आर्किटेक्ट नव्हे तर राज्य सरकार जबाबदार आहे.
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरण असो किंवा राजकोटची पुतळा कोसळण्याची घटना, या सर्वाला देवेंद्र फडणवीस राजकारण म्हणून पाहतात. हा राजकारण नव्हे तर आस्थेचा प्रश्न आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे. या कमिशनखोरीला कोणते राजकारण म्हणायचे? असा सवाल पटोले यांनी या प्रकरणी उपस्थित केला.