![शरद पवार](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2023/12/Untitled-design-2023-12-18T104711.005.png)
माझे वय झाले नाही, आजही भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात आहे. असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा रणशिंगं फूंकत विरोधकांना इशारा दिला.
दरम्यान, त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता? यावरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. खेड तालुक्यातील चर्होली खुर्द येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीच्या पारितोषिक वितरण कार्यक्रामात ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष जगनाथ शेवाळे, विलास लांडे, शर्यतीचे आयोजक मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक सुधीर मुंगसे, सोमनाथ मुंगसे, राष्ट्रवादी युवकचे खेड तालुक अध्यक्ष विशाल झरेकर, तालुका अध्यक्ष हिरामण सातकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, लय भारी लोकांनासुद्धा सरळ करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. जे काही तुमचे दुखणे आहे ते लवकरच दूर करू, यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्व आपण मिळून करु.
लवकरच नवा इतिहास घडवू, अशा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी बैलगाडा शर्यतीचे कौतुक केले. ते म्हणाले आतापर्यंत अनेक शर्यती टीव्हीवर पाहील्यात पण घाटात आल्याशिवाय डोळ्याचे पारणे फिटत नाही, असे त्यांनी नमूद केले. तुम्ही माझे काय बघितले…
माझी एक तक्रार आहे. सगळ्यांच्या भाषणांमध्ये मी 83 वर्षांचा झालो, 84 वर्षांचा झालो, असे म्हणतात. तुम्ही माझे काय बघितले अजून, मी काही म्हातारा झालो नाही, तुम्ही काही चिंता करू नका अशा शब्दांत त्यांनी सत्ताधार्यांना इशारा दिला आहे. सरकारला शेतकर्यांप्रती आस्था नाही
सरकारमध्ये शेतकर्यांबाबत आस्था नाही. कांद्यासह शेतमालाला भाव नाही. कांद्याची निर्यातबंदी केली. शेतकर्यांवर संकट ओढण्याचे काम होत आहे. मात्र आपण एकजुटीने महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहोत, असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी बोलून दाखवला.