
देशाने अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. त्यांनी राज्यात जाऊन राज्यांच्या उभारणीबाबत, विकासाबाबत मते मांडली. परंतु सध्याचे पंतप्रधान त्यावर काही बोलत नाहीत.
त्यामुळे कितीही वेळा पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर हा महाराष्ट्र संधी मिळाल्यानंतर त्यांना आपला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ गांधी मैदानामध्ये शिव-शाहू निर्धार सभा आयोजित केली होती. या सभेत ते बोलत होते. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी विधानसभेत गद्दारी करणार्यांचा लोकसभा निवडणुकीत सूड घेणारच, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
पवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान अनेक राज्यांत जात आहेत. तसे कोल्हापुरातही नुकतेच येऊन गेले. परंतु, त्यांचे दौरे पाहता महाराष्ट्राशिवाय त्यांना काही दिसत नाही, असेच म्हणावे लागेल. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात आले तर आम्ही तुमचे स्वागतच करतो.
महाराष्ट्रात आल्यानंतर काही गोष्टी त्यांनी बोलून दाखविल्या. परंतु, देशाचे पंतप्रधान एखाद्या राज्यात जात असतील, तर राज्यातील धोरणांबाबत, प्रश्नांबाबत चर्चा करणे अपेक्षित असते. तसे मोदी काहीच बोलले नाहीत. यापूर्वीचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू राज्यांत जात तेव्हा ते राज्यांच्या विकासाबाबत, उभारणीबाबत बोलत असत.
पंतप्रधान इंदिरा गांधी अनेकवेळा राज्यांत जायच्या. त्या राज्यातील गरिबी कशी घालवणार यासंबंधी आपले विचार मांडायच्या. परंतु, आजचे पंतप्रधान देशामध्ये फिरतात, महाराष्ट्रामध्ये येतात. पण महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना दोन नावांची प्रकर्षाने अडचण जाणवते. त्यामध्ये एक शरद पवार व दुसरे शिवसेनेचे उद्धव ठाकरे.
यामुळे आमच्यावर बोलल्याशिवाय त्यांना राहवत नाही. पंतप्रधान मोदी कितीही वेळा महाराष्ट्रात आले, तरी त्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास संधी मिळेल तेव्हा महाराष्ट्र तुम्हाला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.