सुनील तटकरे : शरद पवारांचे आमदार काँग्रेसच्या संपर्कात…

Photo of author

By Sandhya

सुनील तटकरे

लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेचा कल महायुतीच्या बाजूने असल्याचा दावा करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) काही प्रमुख आमदार आणि नेते काँग्रेसच्या मार्गावर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज दिली.

मात्र शरद पवार यांचा पक्ष अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ‘राष्ट्रवादी’च्या शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे. मुळात लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अनेक आमदार बाहेर पडणार आहेत. तसेच तटकरे हेच भाजपत प्रवेश करणार आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी केला आहे.

तटकरे म्हणाले, की राज्यात लोकसभा निवडणूक निकालात महायुती सर्वाधिक जागांवर विजय होणार आहे. महायुतीला मिळणारे यश लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गटातील आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या काही प्रमुख आमदारांचा गट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागत असून ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.

काही दिवसापूर्वीच शरद पवार यांनी लहान पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य केले होते. त्याचा हवालाही तटकरे यांनी दिला. या वक्तव्याला त्यांच्या पक्षातील आमदारांच्या या कृतीची किनार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) नेत्या सोनिया दुहान यांनी नुकतीच ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली होती. मात्र त्यांनी या पक्षात प्रवेश केला नाही. त्यानंतर त्यांनी ‘राष्ट्रवादी’च्या (शरदचंद्र पवार) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत नाराजी व्यक्त केली होती. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती.

तटकरे यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट विचारात घेणे या दृष्टीने महत्वाचे आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांची दिल्लीत शुक्रवारी बैठक होत असल्याचे समजते. त्यामुळे पवार गटातील आमदार काँग्रेस पक्षात घेण्यावरून ही बैठक असावी, असा कयास व्यक्त होत आहे.

शरद पवार गटाचा तटकरेंवर पलटवार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नौका बुडणार आहे. त्यामुळे बुडणाऱ्या नौकेत बसायला कोणी तयार नाही. म्हणून स्वतः सुनील तटकरे हे देखील भाजपमध्ये त्या ठिकाणी नावेत बसण्याची तयारी करत आहेत.

त्यांना शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश मिळणार नसल्याने त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही, अशी टीका शेख यांनी केली आहे. अजित पवार यांचा पक्ष पूर्णपणे पराभूत मानसिकतेमध्ये गेलेला असल्याने आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी ते केविलवाणी धडपड आणि त्यातून अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत, असेही शेख यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment