कारगिल वीरांचे शौर्य भारताच्या इतिहासात अजरामर;शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Photo of author

By Sandhya


कारगिल युद्धातील भारतीय जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेले शौर्य हे जगाच्या युद्धइतिहासातील अतुलनीय उदाहरण असून, भारताचा इतिहास जिवंत असेपर्यंत कारगिलचे वीर अजरामर राहतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कारगिल युद्धात शत्रू उंच पर्वतरांगांवर तळ ठोकून बसला असतानाही भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने अद्वितीय समन्वय आणि पराक्रमाचे दर्शन घडवून एक-एक चौकी पुन्हा ताब्यात घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. गोळीबार, बॉम्बहल्ले आणि अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीची पर्वा न करता भारतीय जवानांनी दाखविलेल्या शौर्याला तोड नाही.
कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे यांसारख्या अधिकाऱ्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिल्याचे स्मरण करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीरांचे योगदान भारत कधीही विसरणार नाही. आपल्या वीरांचा सन्मान करणारा समाजच उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.

ते म्हणाले की, सैन्यातील जवान तर मातृभूमीच्या स्वाभिमानासाठी लढत असतात. त्यामुळे शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याची जाणीव करून देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. सुरुवातीला तीन लाख रुपयांवर असलेली मदत टप्प्याटप्प्याने वाढवून 2017 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक शहीद जवानाच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय अमलात आणण्यात आला. शहिदांच्या बलिदानाचे मोल पैशात होऊ शकत नसले तरी राज्य शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी कायम उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे मोठी झेप घेतल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज केवळ शस्त्रास्त्र आयात करणारा देश राहिलेला नसून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती आणि निर्यात करणारे सक्षम राष्ट्र बनला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत त्यांनी भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवाद्यांचे तळ आणि शत्रूची लष्करी ठिकाणे उद्ध्वस्त करून देशाच्या सामरिक सामर्थ्याची जगाला प्रचीती दिली, असे नमूद केले.
राज्याच्या नागरिकांना सुरक्षित वातावरण लाभण्यामागे सीमेवर अहोरात्र देशरक्षण करणाऱ्या सैनिकांचे योगदान असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व शहिदांना विनम्र अभिवादन केले. तसेच वीरसैनिक, वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करून महाराष्ट्र शासन भारतीय सशस्त्र दलांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Leave a Comment

You cannot copy content of this page