
बल्लाळवाडी येथे शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू : परिसरात हळहळ व्यक्त, ग्रामस्थांमध्ये शोककळा
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे दोन लहान मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे.
मृत मुलांची नावे सोहम जयसिंग नवले (वय १२) आणि अभी महेश पवार (१०) अशी असल्याचे समजते. तसेच गाडेकर यांच्या शेतातील तळ्यात ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा आणि रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून संबंधित मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी लहान मुलांनी शेततळे किंवा पाण्याच्या साठ्यांमध्ये आंघोळीला जाणे टाळावे, पालकांनी याबाबतची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
सदर घटनेमुळे शेततळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शेतकऱ्यांनी शेततळ्याला सुरक्षा व्यवस्था कंपाउंड करावे अशी मागणी होत आहे.