
राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राजकोटमधील पुतळा कोसळल्याने आता राज्यातील इतर पुतळ्यांविषयी सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. त्यासाठीच आज संभाजीराजे छत्रपती यांनी एक मोहीम सुरु केली आहे.
त्यासाठी ते आज मुंबईत दाखल झाले असून त्यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे बांधकाम कुठपर्यंत आले आहे हे शोधण्यासाठी गेले आहेत. त्यावरून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला घेरले आहे.
“सरदार पटेल यांचा पुतळा झाला पण अजूनही छत्रपतींचा नाही’ : याविषयी रविवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी “अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा झाली तेव्हा आम्हाला आनंद झाला होता. देशाच्या आर्थिक राजधानीत शिवाजी महाराजांच्या किर्तीला साजेसं स्मारक होणं, ही अभिमानाची बाब होती.
त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवस्मारकाचं जलपूजन केले. मात्र, आता आठ वर्ष उलटल्यानंतरही शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला पण महाराष्ट्रात अजून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहिला नाही,” असे वक्तव्य केले.
आम्ही गुंडगिरी करतोय का? काय म्हणाले संभाजीराजे : ते पुढे म्हणाले, ‘आम्ही फक्त तिथे जाऊन बघून येणार आहोत. आम्ही कायदा हातात घेणार नाही. आम्ही गुंडगिरी करतोय का, आम्हाला अभिवादन करू देत नाहीत. आमचा हेतू प्रामाणिक आहे. मी कायदा मोडत असेल तर इथून परत जातो. अजिबात पुढे जाणार नाही.
गडकोट किल्ल्यांसाठी आम्ही भूमिका घेतली. कारण मी कधीच मतांसाठी बोलत नाही. माझ्या प्रामाणिकपणावर अजिबात शंका घ्यायची नाही. देशातील १३ कोटी जनतेला हे दाखवायचं आहे की जलपूजन या ठिकाणी झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आता खोटं चालणार नाही. भरपूर झालं आता. खूप राजकारण झालं, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला.