
आरक्षण उपवर्गीकरणाबाबत समाजात संभ्रम पसरवू नये – डॉ.हुलगेश चलवादी
२०२७ च्या जनगणनेतील अधिकृत आकडेवारीच्या आधारे निर्णय घ्यावा; आरपीआय ची भूमिका
अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात समाजात विविध प्रकारचे गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. अश्या प्रकारचा संभ्रम पसरवू नये, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. हुलगेश चलवादी यांनी शुक्रवारी (ता.१९) केले आहे. २०२७ मध्ये जनगणनेच्या आधारे हाती येणाऱ्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे निर्णय घेण्यात यावा, अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका पक्षाची सुरुवातीपासूनच असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी समाजबांधवांना उद्देशून लिहिलेल्या जाहीर पत्रातून पक्षाची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा सन्मान राखणे ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका असून, संविधानाच्या चौकटीत राहूनच समाजहिताचे निर्णय व्हावेत, यावर पक्षाचा भर असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
अनुसूचित जातींतील कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये, प्रत्येक समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या आणि वस्तुनिष्ठ आकडेवारीच्या आधारे न्याय मिळाला पाहिजे, ही ना. आठवले साहेबांची स्पष्ट भूमिका आहे. यासाठी २०२७ च्या जनगणनेतील अधिकृत आकडेवारी समोर आल्यानंतरच शासनाने पुढील निर्णय घ्यावेत, अशी पक्षाची मागणी आहे.
सध्या काही व्यक्ती आणि संघटना अपुऱ्या माहितीच्या आधारे समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.अशा अफवांवर विश्वास ठेवून समाजात मतभेद निर्माण करणे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या एकात्मतेच्या विचारांना छेद देणारे आहे. त्यामुळे समाजबांधवांनी संयम बाळगावा आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी, असे आवाहनही डॉ.चलवादी यांनी केले.