![आमदार रोहित पवार](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2024/05/Untitled-design-2024-05-15T154053.636.png)
केंद्रात आरोग्य राज्यमंत्री असतानाही मतदारसंघात गरोदर मातांना आरोग्य सोयी-सुविधा न मिळाल्याने सर्वाधिक माता-बाल दगावण्याच्या घटना नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी भागात अधिक घडलेल्या आहेत.
या भागात नव्याने दवाखाने मंजूर केले नाही. आदिवासींच्या आरोग्याशी खेळणाऱ्या केंद्रिय मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.
पेठ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार कॉ. जे. पी. गावित होते. उबाठाचे तालुकाध्यक्ष भास्कर गावित यांनी प्रास्ताविक केले.
व्यासपिठावर माजी आमदार रामदास चारोस्कर, आमदार सुनील भुसारा, कॉंग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल. माजी आमदार नितीन भोसले, जयंत दिंडे, कोंडाजी मामा आव्हाड, पुरुतोषत्तम कडलक, अशोक बागुल, दि. ना. उघाडे, भिका चौधरी, दामु राऊत, देवराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक प्रश्नांवर बोलताना पवार म्हणाले, नैर्सगिक साधन संपत्ती लाभलेल्या पेठ तालुक्यात अडिच हजार मिमी पाऊस पडत असतांना येथील आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
रोजगार व उपजीविकेसाठी ८ महिने स्थलांतरीत व्हावे लागते. हे चित्र थांबविण्यासाठी स्थानिक पातळीवर धरणांची पाझर तलावाची निर्मिती करावी लागेल. परिणामी, स्थानिक शेती विकसित झाली तर स्थानिक रोजगार निर्माण होईल.
त्यामुळे स्थलातंराबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण कायमस्वरूपी निकाली निघेल. त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन आमदार पवार यांनी केले.