गिरीश महाजन : जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही

Photo of author

By Sandhya

गिरीश महाजन

दोन-चार दिवस मागे-पुढे होतील परंतु, आम्हाला मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणाला वेगळे वळण मिळायला नको, त्यामुळे या मुद्द्यावरून कोणी भांडू नये, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देऊ, असा दावा करत मनोज जरांगे यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही.

आम्ही त्यांना विनंती करू, त्यांनी मुंबईला जाण्यासंदर्भात फेरविचार करावा, असे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. येत्या १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा संमेलनांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होत आहे.

नियोजित सभास्थळ तपोवनातील साधुग्राम मैदानाची पाहणी करत सभेच्या तयारीचा आढावा मंत्री महाजन यांनी घेतला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणावर त्यांनी भाष्य केले.

ते म्हणाले की, आम्ही अन्य कोणाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देऊ, त्रुटी दूर करून आरक्षण देऊ. पंतप्रधानांच्या दौऱ्याविषयी महाजन म्हणाले की, येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन असल्याने क्रीडा व युवा खात्यातर्फे युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

हा महोत्सव १६ जानेवारीपर्यंत चालेल. सुमारे आठ हजार विद्यार्थी सहभागी होतील. या अंतर्गत पाच दिवस विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था, सांस्कृतिक, खाद्यमहोत्सव कार्यक्रम होईल. राज्याची संस्कृती दाखविण्याची संधी, स्पर्धा होतील, वक्तृत्व स्पर्धा, कथा-लेखन स्पर्धा असे उपक्रम होतील.

त्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल, अशी माहिती त्यांनी दिली. उद्धव ठाकरेंवर टीका करताना महाजन म्हणाले की, एकीकडे धारावीच्या मुद्द्यावर मोर्चे काढले जातात आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे अदानी यांची भेट घेतात. ते माझे मित्र असल्याचे सांगतात.

आता उद्धव ठाकरे यांनीच ठरवावे. ठाकरे यांना राममंदिर उद‌्घाटनाचे निमंत्रण मिळाले का हे माहीत नाही. परंतु त्यांच्याकडून जे राजकारण सुरू आहे. ते चांगले नाही. राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण आहे. ठाकरे गट राष्ट्रीय पक्ष राहिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

Leave a Comment