मनोज जरांगे पाटील : आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार…

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे पाटील

शासनाला सात महिन्यांचा कालावधी देऊनही आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा अपमान आहे. वारंवार आंदोलने, उपोषण करून सरकारला फरक पडत नसेल तर आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार असल्याची ग्वाही संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

तालुक्यातील सुपा येथील सरदार श्रीमंत शाबुशिंग पवार मैदानावर भगवे वादळ धडकताच पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत जरांगे बोलत होते.

जरांगे पाटील म्हणाले की, मी तुमच्या जीवावर मुंबईकडे कूच करत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी गुलाल घेऊनच घरी येईल. मी मरणाला भीत नाही, आता माघार नाही. सरकारने अनेक प्रयत्न केले पण मी मॅनेज होणाऱ्यातला नाही.

आता मात्र मुंबईत भगवे वादळ निर्माण होणार यात शंका नाही. अर्धी लढाई आपण जिंकलो आहे, आता फक्त थोडी लढाई बाकी आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, मी असेन किंवा नसेल तुम्ही मात्र एकत्र रहा, असे आवाहन केले.

पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सुमारे १७० एकर क्षेत्रावर मराठी बांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली. पारनेर सकल मराठा समाजाच्या वतीने लापशी व मसाला भात महाभोजनाचे तर श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील मराठी बांधवांच्या वतीने नाष्टा व भोजनासाठी सुमारे ५१ स्टॉल लावण्यात आले. संपूर्ण सुपा शहर भगवे झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा गर्दीचा महासागर उसळला होता तर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

एकंदरीत सुपा येथील ऐतिहासिक नगरी भगवेमय झाली होती. “एक मराठा, कोटी मराठा” घोषणांनी परिसर दणाणून गेला. सायंकाळी उशिरा शिरूरच्या दिशेने पदयात्रेचे प्रस्थान झाले. आठ जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.

तो फलक ठरला लक्षवेधी मनोज जरांगे पाटील यांचे सुपा येथील मैदानावर आगमन होण्यापूर्वी तरूण मराठा आंदोलकांच्या हातात ” आमदार – खासदार वाटत आहे चहा, हा तर मराठ्यांचा सोहळा आहे, जरा निरखून पहा ” हा फलक आंदोलन स्थळी लक्षवेधी ठरला.

Leave a Comment