
हत्येनंतर प्रियकरानं १५ दिवसात केलं लग्न
पुणे : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे संबंध तरीही दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची तयारी. यातून दोघात वाद. मुलीचा मित्राच्या मदतीने खून केला. तिचा मृतदेह दिवे घाटात टाकून दिला. यानंतर १५ दिवसांनी दुसऱ्या मुलीशी लग्नही केले. ५६ दिवस मुलगी बेपत्ता असल्याने पोलीस व नातेवाईकही हैराण होते. अखेर खुनाचा उलगडा झाला अन् लोणीकंद पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. ही घटना फुलगाव येथे घडली.
बालाजी रामराव हिंगे (वय २५ ) व त्याचा मित्र सचिन संजय रणपिसे (वय २६) (दोघेही रा फुलगाव) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी व त्या मुलीचे प्रेमसंबंध होते. तरी बालाजी हा दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. दोन महिन्यांपूर्वी ते बरोबर बाहेर गेले. त्यांचा वाद झाल्याने त्याने तिचा सरळ खूनच केला.
मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी दोन नोव्हेंबर २०२४ रोजी पोलिसात तक्रार दिली. पोलीस व नातेवाईक दोन्ही शोध घेत होते. मात्र तिचा तपास लागत नव्हता. यामुळे सर्वच हैराण होते. सर्व बाजूच्या तपासानंतर ५६ दिवसानी त्या मुलीचा खून झाल्याचा व मृतदेह दिवे घाटात टाकल्याचा सुगावा लागला. दोघांनाही ताब्यात घेवून पोलिसांनी मृतदेह शोधला.
२८ डिसेंबर रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना कळताच फुलगाव मधील ग्रामस्थ हादरले. त्यांनी हळहळ व्यक्त केली.
ही कामगिरी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी कंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे व त्यांच्या पथकाने केला.
तिचा खून केल्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह दोन दिवस एका वाहनात ठेवला. नंतर दोघे जण मृतदेह दिवे घाटात कोठे टाकता येईल याची पाहणी करून आले. नंतर पोत्यात भरून त्यांनी मृतदेह दिवे घाटात टाकला. परत तिकडे जावून त्यांनी दोन तीन वेळा पाहणीही केली. अखेर उघडकीस आलेच.
आरोपी बालाजी याने खून केल्यानंतर १५ दिवसात ठरलेल्या मुलीशी लग्न केले. त्याने एका मुलीचा खून केला आहे. याची किंचितशी कल्पनाही कोणाला आली नाही. ज्या मुलीशी लग्न झाले ते कुटुंबीयही याबाबत अनिभिज्ञ होते. ही घटना उघडकीस येताच ग्रामस्थ अवाक झाले.
त्या मुलीची शोकसभा गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. शोकसभा सुरू असतानाच ग्रामस्थ अचानक संतप्त झाले व त्यांनी आळंदी रस्त्यावर रस्ता रोको करून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. पोलीस आल्यानंतर रास्ता रोको मागे घेवून निवेदन देण्यात आले