
या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असून माजी सरपंच उघडे यांच्यावर हल्ला का झाला? आणि कशामुळं झाला? याचे कारणही आरोपी पकडल्यानंतर समोर येणार असल्याचं सांगण्यात आले.
प्रदिप भणगे, ठाणे (शहापूर) : बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्येचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच, ठाणे जिल्ह्यातही अजनुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर भर रस्त्यात कार अडवून त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे या हल्यात माजी सरपंचाचे दोन्ही पाय तोडल्याने त्यांच्यावर कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लखोरांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. कदम उघडे असं हल्ल्यात गंभीर झालेल्या माजी सरपंचाचे नाव असून त्यांच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्हातील शहापूर तालुक्यातील कसारा भागात अजनुप ग्रामपंचायत असून या अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे हे आपल्या कामानिमित्ताने घरून कारने एकटेच आज २ जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता निघाले होते. मात्र त्याचवेळी अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गायधरा गावाच्या माळ रानात ते कारने जात असतानाच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली आणि कारवर दगडांचा मारा केला. त्यानंतर कारच्या आतमध्ये असलेले माजी सरपंच कदम उघडे यांना हल्लेखोरांनी कार बाहेर काढत बेदम मारहाण केली. या मारहाणीत माजी सरपंचाचे दोन पायांना जबर मार लागल्याने त्यांना शहापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोन्ही पाय तुटल्याचे सांगितले यामुळे पुढील उपचारासाठी कल्याण येथे पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असून माजी सरपंच उघडे यांच्यावर हल्ला का झाला? आणि कशामुळं झाला? याचे कारणही आरोपी पकडल्यानंतर समोर येणार असल्याचं सांगण्यात आले. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच आरोपीला अटक केली जाणार असल्याचे सांगितले असून पुढील तपास कसारा पोलीस करत असल्याचेही सांगितले.