![प्रकाश आंबेडकर](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2024/05/Untitled-design-2024-05-24T150117.310.png)
देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरु आहेत. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लबोल केलाय.
त्यांनी ,”लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडलीय, एवढंच नाही तर त्यांनी लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतीसारखी केलीय”अशी टीका केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना ही टीका केली. यावेळी त्यांनी “तत्कालीन पंतप्रधानांनी आपापल्या पक्षांचा प्रचार केला हे खरं आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचं रूपांतर ग्रामपंचायत निवडणुकीत केलंय.
मोदी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचार करतात आणि विधानसभा निवडणुकीतही तेच करतात. स्थानिक पातळीवरील निवडणुकीतही पंतप्रधान मोदी हेच करतात.”असा आरोप त्यांनी केला. “वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात 48 पैकी 3 जागा जिंकेल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
आम्ही 38 जागांवर आमचे उमेदवार उभे केलेत. खरं तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा समावेश आहे.
दुसरीकडे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत दोन आघाड्यांमध्ये आहे.”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी प्रचारादरम्यान वैयक्तिक हल्ले करत आहेत, जे अत्यंत वाईट आहे. पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खालावली आहे. सत्ताधारी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणेचा कसा वापर करतात, हे या निवडणुकीनं दाखवून दिलं आहे.”असे त्यांनी म्हटलं.