‘Pune Agricultural Innovation Competition’ to be statewide from next year; First award to be given in the name of late Ajit Pawar – Chief Minister Devendra Fadnavis

Photo of author

By Sandhya

पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव

पुणे, दि. १७ : शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल तसेच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

कृषी विभागाच्यावतीने कृषी महाविद्यालय येथे आयोजित दुसऱ्या ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा-२०२६’च्या समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर , हेमंत रासने,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्यामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष योगदान आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी तब्बल १ हजार २९० अर्ज प्राप्त झाले असून विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील चार संशोधन प्रकल्पांचे उत्पादन प्रत्यक्षात सुरू झाले असून आणखी १२ उत्पादने लवकरच बाजारात येणार आहेत.

या स्पर्धेतून केवळ कल्पना मांडल्या जात नाहीत, तर त्या प्रत्यक्ष उत्पादनात उतरून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतात. यंदाच्या स्पर्धेतील १८ निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत व मार्गदर्शन देण्यात येणार असून त्यापैकी किमान १२ प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.

प्रदर्शनात शेतीतील तंत्रज्ञानाचा प्रभावी वापराबाबत उपयुक्त नवकल्पना आहेत. उपग्रह नकाशांकन आणि मृदा परीक्षणाच्या आधारे जमिनीचे अचूक विश्लेषण करणारे नमुने, शेताच्या रचनेनुसार ओलावा व्यवस्थापन करून आवश्यक तेवढाच पाणीपुरवठा करणारी यंत्रणा, तसेच तण आणि पीक ओळखून स्वतंत्र फवारणी करणारे तंत्रज्ञान अशा विविध संकल्पनांचे मुख्यमंत्री यांनी विशेष कौतुक केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असून भविष्यात त्याची अचूकता आणखी वाढेल. पीक विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मानवरहित यंत्रे आणि उपग्रह नकाशांकनाच्या माध्यमातून अचूक अहवाल तयार करणारे तंत्रही उपयुक्त ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, बदलते हवामान, पाण्याची कमतरता, खतांची टंचाई, मजुरांची कमतरता आणि बाजारभावातील चढ-उतार या विविध आव्हानांना सामोरे जाताना कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. नवोपक्रमांना चालना देण्यासाठी आणि जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page