अजित पवार : इथेनॉलवरील बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना भेटणार…

Photo of author

By Sandhya

अजित पवार

इथेनॉलवरील बंदी उठविण्यासाठी राज्य सरकार केंद्रीय मंत्र्यांना भेटून यातून निश्चितपणे मार्ग काढेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. या बंदीचे सभागृहात तीव्र पडस?ाद उमटल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी सदस्यांना आश्वस्त केले.

देशभरात उसाची कमतरता असल्याने साखरेच्या उत्पादनावर आणि दरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकारने उसाच्या रसापासून तसेच सिरपपासून तयार केल्या जाणार्‍या इथेनॉलवर बंदी घातली आहे.

विधानसभेत विरोधकांनी यावर आवाज उठवला. त्यावर पवार यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. या निर्णयामुळे शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

त्यामुळे येत्या सोमवारी किंवा मंगळवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पीयूष गोयल यांना भेटून निश्चित मार्ग काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत शुक्रवारी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाच्या वतीने स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला असता त्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनुमती नाकारली.

मात्र यावर म्हणणे मांडण्याची संधी त्यांनी विरोधी पक्षाला दिली. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केंद्र सरकारचे कृषी माल विषयक निर्यात बंदीचे धोरण आणि ऊसाच्या रसापासून केल्या जाणार्‍या इथेनॉल निर्मितीवर केंद्राने आणलेली बंदी यावर ऊहापोह केला.

त्यावर पवार म्हणाले, राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न, मराठा आरक्षणाचा विषय, अवकाळी पाऊस, गारपीट, दूध, कापूस, संत्रे आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. सर्व शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेतला जाईल.

Leave a Comment