
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी तुरुंगातून अनेक गुंडांना पॅरोलवर सोडण्यात आले. त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या, याची माहिती आमच्याकडे आहे. त्या गुंडांची चौकशी झाली पाहिजे.
या गुंडांचा वापर निवडणुकीत होतो. आगामी लोकसभेतही असा प्रकार होऊ शकतो. तसेच, सत्ताधारी भाजपचे लोकप्रतिनिधी भरदिवसा गोळीबार करत आहेत. जाहीरपणे धमकावत आहेत. गुंडांचे उदात्तीकरण केले जात आहे.
महाराष्ट्रात गुंडाचे राज्य आल्याचे सध्या चित्र आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी राज्य सरकारवर केला. आकुर्डीत शिवसेना (ठाकरे गट) यांचा जनाधिकारी जनता दरबार झाला. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, भाजपचा आमदार गोळीबार करत आहे.
तोही मित्र पक्षाच्या माणसावर. दोघेही गुंडगिरी प्रवृत्तीचे आहेत. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र एका गुंडाला भेटतात. कोकणातील एक जण आमचा ‘बॉस’ सागर बंगल्यावर असल्याचे सांगत जाहीरपणे चिथावणी देत आहे.
पुण्यात गुंडाचे उदात्तीकरण केले जात आहे. ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलला सोडून डॉक्टरांवर कारवाई केली जाते. मुंबईत काल पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या.
महाराष्ट्र गुंडगिरीकडे झुकत असल्याचे दिसत आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा वचक राहिलेला नाही. ते केवळ राजकारणात गुंतले आहेत. गुंडाचा राजकारणासाठी वापर होत आहे, अशी टीका त्यांनी केली.