जरांगे-पाटील बेमुदत उपाेषणावर ठाम, राज्‍य सरकारला चार दिवसांचा कालावधी

Photo of author

By Sandhya

जरांगे-पाटील

मराठा आरक्षण प्रश्‍नी जालना येथे बेमुदत उपाेषणाला सुरु केलेले मनाेज जरांगे-पाटील यांची आज सायंकाळी राज्याच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली.

यावेळी बेमुदत उपाेषणावर ठाम राहात, राज्‍य सरकारने आणखी चार दिवसांचा कालावधी घ्‍यावा;पण मराठा आरक्षणावर ठाेस ताेडगा काढावा, असे आवाहन जरांगे- पाटील यांनी राज्‍य सरकारच्‍या शिष्टमंडळाला केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी २९ ऑगस्टपासून जालना येथे जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. आज पुन्‍हा एकदा राज्याच्या शिष्टमंडळाने त्यांना उपोषण मागे घेण्‍यात यावे यासाठी मनधरणी केली.  

शिष्टमंडळात मंत्री गिरीष महाजन, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अर्जुन खोपकर आणि मंत्री अतुल सावे यांचा समावेश होता. मराठा आरक्षणप्रश्‍नी ताेडगा काढण्‍यासाठी एक महिन्याचा वेळ मिळावा, अशी मागणी यावेळी महाजन यांनी केली. 

आंदोलनात टोकाची भूमिका घेऊन चालत नाही असं महाजन म्हणाले. एका दिवसात जीआर निघणं अशक्य आहे, त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी जंरागे-पाटील यांना केली.

जरांगे-पाटील यांनी शिष्टमंडळाला आपली भूमिका स्पष्ट करत ठामपणे सांगितले की, मराठा आरक्षणप्रश्नी मी माघार घेणार नाही. मागील वेळेस सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिलेला होता मात्र तरीही कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नव्हता.

त्यामुळे सध्या सरकारने यासंबंधी तात्काळ निर्णय द्यावा, या मागणीवर ते ठाम राहिले. सरकारने आणखी चार दिवसांचा कालावधी घ्‍यावा;पण मराठा आरक्षणावर ठाेस ताेडगा काढावा, असे आवाहन जरांगे- पाटील यांनी केले.

Leave a Comment