जयंत पाटील : महायुतीकडून गुजरातला महाराष्ट्र आंदण…

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या त्रिकूटाने महाराष्ट्र हा गुजरातला आंदण दिला आहे. महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधण्याचे पाप त्यांनी केले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मिरजेच्या किसान चौकातील जाहीर सभेत केले. आता महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांचे सरकार आणूया, असे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी यावेळी केले.

महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, उमेदवार तानाजी सातपुते, मोहन वनखंडे, बाळासाहेब होनमोरे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. यावेळी नितीन बानुगडे-पाटील, सिद्धार्थ जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार जयंत पाटील म्हणाले, मिरजेने कायम पुरोगामी विचार उचलून धरला आहे. हाच मिरजेचा इतिहास आहे. अशी रचनाच या मिरजेची आहे. मागील दहा वर्षांमध्ये मात्र यामध्ये काहीसे अंतर पडले आहे. त्याचा परिणाम आपण अनुभवला आहे. मिरजेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते आम्ही सोडवू. ते म्हणाले, महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन महाविकास आघाडी ही निवडणूक लढवत आहे.

महाविकास आघाडीतील सर्व नेते पूर्ण ताकतीने काम करत आहेत. पाच प्रमुख गॅरंटी आम्ही राज्यातील जनतेला दिल्या आहेत. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वाधिक जीएसटी भरतो. मागील महिन्यात महाराष्ट्राने तीस हजार कोटी रुपयांचा जीएसटी भरला आहे. प्रचंड जीएसटी महाराष्ट्रातील जनतेने भरला, मात्र या जनतेच्या पदरात काय पडले नाही. सगळे उद्योग गुजरातला गेले.

Leave a Comment