नितेश राणे : मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान करण्यासाठी हालचाल…

Photo of author

By Sandhya

नितेश राणे

मालेगावात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच शहराचा समतोल विकास साधण्यासाठी व नवीन उद्योग येण्यासाठी मालेगावात पोलिस आयुक्तालय निर्माण करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मालेगाव शहराची ओळख जातीय दंगलीचे शहर म्हणून झाली आहे. त्यामुळे तेथे उद्योग येत नाहीत. या शहराचा समतोल विकास साधण्यासाठी नवीन उद्योग येणे गरजेचे आहे. यासाठी मालेगावात नवीन पोलिस आयुक्तालय स्थापन करावे, अशी मागणी राणे यांनी पत्रात केली आहे.

मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान करण्यासाठी हालचाल सुरू असल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे.

ड्रग्ज आणि अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढले आहे. तिथे पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. मालेगावमध्ये कोणताही गुन्हा घडल्यास पोलिसांना पोहोचण्यासाठी किमान अडीच तास लागतो. त्यामुळे आपण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस यंत्रणेकडे या शहराची दंगलींचे शहर अशी नोंद दिसून येते. जगभरातील वेगवेगळ्या घटनांचे प्रतिसाद मालेगाव शहरांमध्ये उमटतात तसेच काही वेळेला दंगल नियंत्रणात आणण्याकरिता मालेगावमध्ये लष्करालाही पाचारण करावे लागले होते.

पोलिस अहवालानुसार 2001-2023 दरम्यान 188 जातीय दंगली घडल्या असून, त्यामध्ये दोन मुख्य बॉम्बस्फोटांचा समावेश याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यंत्रमाग उद्योग वाढवा मालेगाव शहरातील मुख्य व्यवसाय हा यंत्रमाग उद्योग असून, तो नागरी वस्तीतूनच चालवला जातो. मागील काही वर्षांत पीव्हीसी पाइप उत्पादन करणारे काही युनिट मालेगाव औद्योगिक क्षेत्रात सुरू झाले आहेत. पण त्याचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याचा दावा राणे यांनी केला आहे.

Leave a Comment