
जिल्हा बँकेच्या पुरंदर विभागाला २३ कोटी ६३ लाखांचा नफा….. संचालक संजय जगताप यांची माहिती
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात पुरंदर तालुक्यातील १३ शाखांमधून सभासदांना ३२४ कोटी ७१ लाख इतके कर्ज वाटप केले. त्यापैकी २४३ कोटी ८५ लाख रुपये एवढी रक्कम आणि ७५.१० टक्के एवढी वसुली होऊन बँकेला २३ कोटी ६३ लाख ९७ हजार रुपये इतका नफा झाल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक व पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी दिली.
चालू खरीप हंगामाला १ एप्रिल २०२६ पासून सुरुवात झाली असून तालुक्यातील ९७ संस्थांपैकी ९७ संस्थांचे पिक कर्ज मंजूर झाले असून ५ एप्रिल पासून खरीप हंगाम वाटपास सुरूवात झाली आहे. याबाबत संजय जगताप यांनी तालुक्यातील सर्व विकास अधिकारी व सचिव यांची बैठक घेऊन ज्या शेतकरी सभासदांनी ३१ मार्च अखेर त्यांच्याकडील कर्जाचा भरणा केला असेल त्यांना क्षेत्राप्रमाणे रक्कम वाटप करण्याच्या सूचना केल्याची माहिती विभागीय अधिकारी महेश खैरे यांनी दिली.
दरम्यान, दि. २० एप्रिल २०२६ पर्यंत ११ हजार ५५६ सभासदांना ११६ कोटी ३२ लाख ५९ हजार इतके कर्जवाटप केले आहे. ३० सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी सभासदांना तालुक्यातील १३ शाखांमधून खरीपाचे पिक कर्ज वाटप पूर्ण करण्याच्या सूचना संचालक संजय जगताप यांनी दिल्या आहेत. सदर बैठकीला वसुली अधिकारी किरण जाधव, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, विकास अधिकारी राजन जगताप, जयेश गद्रे, अण्णा शिंदे, शिरीष जाधव, मयूर भुजबळ, पवन दुर्गाडे, शरद वणवे, यांसह सचिव रफिक शेख, तुकाराम गायकवाड, हनीफ सय्यद, रवींद्र कांबळे, संदीप ताकवले, दीपक जगताप, अमोल यादव, विजय कांबळे, वैभव काकडे, अमोल फडतरे, जालिंदर बाठे, रसूल शेख, संतोष गुरव, सोमनाथ चव्हाण, दादा खोमणे, चंदू खोमणे, नितीन जगताप, सतीश शिंदे, सुहास जगताप इत्यादी उपस्थित होते.
- १०० टक्के वसुल संस्था – २६.
- ९० ते ९९ .९९ टक्के वसुल संस्था – १५.
- ८० ते ८९ . ९९ टक्के वसुल संस्था – १५.
- ७० ते ७९ . ९९ टक्के वसुल संस्था – १६.
- ६० ते ६९ . ९९ टक्के वसुल संस्था – १२.
- ५० ते ५९ . ९९ टक्के वसुल संस्था – ०५.
- ५० टक्केच्या आतील वसुल संस्था – ०८.
ठेवीचे उद्दीष्ट पार..
३१ मार्च २०२६ अखेर जिल्हा बँकेने पुरंदर तालुक्यातील शाखांसाठी ६४६ कोटी ठेवींचे उद्दीष्ट ठेवले होते. उद्दीष्टाचा हा टप्पा पार करीत पुरंदर तालुक्यातील १३ शाखांतून ७०४ कोटी ३३ लाख ९७ हजार ठेवी जमा केल्या आहेत.