शेतकऱ्यांसाठी समाधानकारक माहिती ; राज्यात आजपासून पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Photo of author

By Sandhya

राज्यात आजपासून पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दडी मारली आहे.  शेतकऱ्यांना सध्या चांगल्या पावसाची गरज आहे. कारण खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी समाधानकारक माहिती दिली आहे. त्यानुसार, आजपासून राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मेघ गर्जनेसह पावसाचाही  इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, बहुतांश भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.

आज राज्यातील काही भागात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, उद्यापर्यंत मुंबईसह  संपूर्ण कोकणातही जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या पाच जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता आहे.

यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आणि जून महिना कोरडा गेला. त्यात जुलै महिन्यात तोडफार पाऊस झाल्यानं पिकांना जीवनदान मिळालं होतं. मात्र, ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला. त्यामुळं पावसाचा मोठा खंड पडला आहे.

राज्यातील 453 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिकचा खंड, तर 613 महसूल मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसांपासून पाऊसच पडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भागात पिकांची बिकट परीस्थिती असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत जर पाऊस झाला नाही तर ही पिकं पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

राज्यात चांगला पाऊस नसल्याने अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. ग्रामीण भागातील पाझर तलावातील पाणी देखील आटले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

पिकं तर अक्षरशः करपून गेली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने प्रकल्पातील पाणीसाठा देखील चिंता वाढवणारा ठरत आहे.

Leave a Comment