पुण्याहून सासवड कडे येताना बोपदेव घाट घाट ओलांडल्यानंतर ऑस्करवाडी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकला जात असून त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याच्या लगतच मोठ्या पिशव्यांमध्ये कचरा येथे आणून टाकला जात आहे, यामध्ये शिल्लक वा खराब झालेले खाद्यपदार्थ, प्लास्टिक पिशव्या, याशिवाय मेलेल्या कोंबड्या आदी आरोग्यास धोकादायक कचरा या परिसरात टाकला जात असून त्यामुळे या परिसरातील शेतीतील उत्पादनावरही घातक परिणाम होत आहे. या परिसरात ऑस्करवाडी व भिवरी हद्द असून ग्रामीण भागातील ग्रामपंचायती अशा कचऱ्यावर प्रक्रिया करणे व त्याचे विघटन करणे यासाठी सक्षम नाहीत, त्यामुळे असा साठणारा कचरा नागरिकांच्या आरोग्यासोबतच जनावरांसाठी व शेतीसाठी घातक होत आहे. यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांनी संयुक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढील काळात अशा कचऱ्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात याची गंभीरपणे नोंद घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
बोपदेव घाट घाटातील कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त
